धनश्री धारकर हे नाव मराठी वाचकाला ज्ञात आहे. अतिशय संवेदनशील, तरल आणि भाविश्वात घेऊन जाणाऱ्या कविता त्यांच्या लेखनातून प्रतित होतात. निसर्ग, मानवी व्यवहार, मानवी वृत्ती आणि आध्यात्म तसेच स्वतःच्या जगण्याबद्दल तिला खूप प्रश्न पडतांना या कवितांमध्ये दिसतात.
धनश्री धारकर यांची ‘मौनातलं आभाळ’ मधील कविता ही जीवनातील सुखाचा शोध घेणारी कविता आहे. हा सुखाचा शोध घेताना ती कविता जगण्यातील नागमोडी वळणांना सामोरी जाते. त्या वळणांना कधी स्पर्श करते, कधी त्यांना ओलांडून पुढे जाते तर कधी त्या वळणांना ओलांडून पुढे गेल्यावर हळूच मागे वळून पाहत आपल्या अंतर्गत सामर्थ्यांने उन्नत झालेला माथा अधिक स्वाभिमानाने उंचावत पुढच्या प्रवासाला निघते. त्यामुळे ही कविता जगण्यातील अनेक भावोत्कट चढउतारांना आपल्यात पचवीत नव्या वाटांचा शोध घेत राहते.





